पावसात पुण्याची वाहतूक ठप्प; प्रशासनाची निष्क्रियता की नियोजनाचा अभाव?
स्वाभिमानी ब्रिगेड अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांचा आरोप
पुणे. मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. (pune rain traffic chaos swabhimani brigade- allegation)
Video : कोसळलेला पूल आणि कोसळलेली जबाबदारी : कुंडमाळा पूल कोणत्या विभागाचा ?
शहरातील नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापन (pune rain traffic) यामध्ये घोळ असल्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचते, चेंबर ओव्हरफ्लो होतात आणि मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. महापालिकेने वर्षानुवर्षे पावसाळ्यापूर्वी तयारीचे दावे केले असले तरी, प्रत्यक्षात नाले तुंबलेले, रस्त्यांवर खड्डे आणि अर्धवट कामेच दिसून येत आहेत. शहरात मेट्रो, पाइपलाइन, रस्ते कामे एकाच वेळी सुरू ठेवण्यात आली असून यांचे योग्य नियोजन न केल्यामुळे रस्त्यांवर अडथळे वाढले आहेत. अनेक भागांत वाहतूक पोलीसही अनुपस्थित असतात, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असेही रोहन सुरवसे पाटील यांनी स्पष्ट केले.
“महापालिका दरवर्षी सांगते की पावसाळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, पण प्रत्यक्षात ही हमी फसवी ठरते. नालेसफाई, रस्त्याचे खोदकाम आणि वाहतूक नियोजनात ढिसाळपणा आहे. ही निष्क्रियता म्हणजे पुणेकरांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थट्टा आहे.”
— रोहन सुरवसे पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य