महाराष्ट्रात उद्योग येतील ; पण रोजगार कोणाला मिळणार? यूडीएस फाउंडेशनने व्यक्त केली चिंता

 

पुणे : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या औद्योगिक, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत राज्यात ७०.५ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करून ५० लाख रोजगार निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. एमआयडीसी औद्योगिक वसाहती, उत्पादन क्लस्टर्स, लॉजिस्टिक्स हब आणि एकात्मिक औद्योगिक टाउनशिपच्या विस्तारातून राज्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होणार आहे. मात्र, या विकासाचा खरा लाभ स्थानिक नागरिकांना मिळण्यासाठी केवळ उद्योग उभारणे पुरेसे नसून त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे तितकेच आवश्यक असल्याचे मत यूडीएस फाउंडेशनचे संस्थापक व संचालक कृष्ण मोहन पिन्नापराजू यांनी व्यक्त केला आहे. 

 

 

 

आजपर्यंत आर्थिक विकासाचा अर्थ रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर असा घेतला जात होता. मात्र, आधुनिक उत्पादन क्षेत्र, मजबूत लॉजिस्टिक्स व्यवस्था आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे उद्योग आता मुंबई-पुण्याबाहेरील टियर-२ शहरे आणि उदयोन्मुख औद्योगिक जिल्ह्यांकडे वळत आहेत. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.मात्र, या संधीचे यश एका महत्त्वाच्या घटकावर अवलंबून आहे. आधुनिक उद्योगांना केवळ उपलब्ध मनुष्यबळ नव्हे, तर प्रशिक्षित तंत्रज्ञ, मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, गुणवत्ता निरीक्षक, लॉजिस्टिक्स तज्ज्ञ, देखभाल कर्मचारी आणि डिजिटल कौशल्य असलेले कर्मचारी आवश्यक आहेत. स्थानिक पातळीवर असे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास उद्योगांना बाहेरून कर्मचारी आणावे लागतात आणि स्थानिक युवक विकास प्रक्रियेपासून दूर राहतात.

 

 

 

त्यामुळे कौशल्य विकासाकडे केवळ सामाजिक उपक्रम म्हणून नव्हे, तर आर्थिक पायाभूत सुविधेचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्याची गरज आहे. प्रत्येक नवीन औद्योगिक वसाहतीसोबत उद्योगांच्या गरजेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप आणि सातत्यपूर्ण कौशल्यविकास कार्यक्रम राबविल्यास उद्योगांची उत्पादकता वाढेल आणि युवकांना स्वतःच्या परिसरातच दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 

 

कृष्ण मोहन पिन्नापराजू म्हणाले, “महाराष्ट्राकडे औद्योगिक विकास आणि समुदाय विकास यांना एकत्र पुढे नेण्याची मोठी संधी आहे. केवळ औद्योगिक पार्क उभारून विकास साध्य होणार नाही. त्या उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्य स्थानिक युवकांमध्ये विकसित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा युवकांना आपल्या परिसरातच चांगल्या करिअरच्या संधी मिळतात, तेव्हा उद्योगांना विश्वासार्ह मनुष्यबळ मिळते, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते आणि विकास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरतो.”

 

Local ad 1