नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे
केळी, पपई फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी
Nanded Farmers News। नांदेड : मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !
पालकमंत्री अतुल सावे यांनी अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, अर्धापूर शिवार, लहान शिवार येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी जिल्हा प्रशासनास तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत अहवाल सादर केला जाईल आणि नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असे पालकमंत्री सावे यांनी स्पष्ट केले.
अर्धापूर तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर शेट्टे, व्यंकटराव साखरे, गिरीश कल्याणकर आणि विठ्ठल इंगळे यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. (nanded shetkari nuksan bharpai atul save)

यानंतर नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील अतिवृष्टी व वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आमदार डॉ. तुषार राठोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदार अशोक चव्हाण यांनीही या बैठकीत केळी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदतीची मागणी केली.