पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन
९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोलापूर | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चितमपल्ली यांचे आज (18 जून 2025) संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या सोलापुरातील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. चितमपल्ली यांना ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दिल्लीतून परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली होती. ते आजारी होते व अंथरुणास खिळले होते. (maruti chitampalli passes away 2025)
🟢 वनसेवा आणि निसर्गप्रेम
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी संपूर्ण देशात ५ लाख किमीचा प्रवास करत आदिवासी व जमातींसोबत संवाद साधला. त्यांना १३ भाषांचे ज्ञान होते. त्यांनी लिहिलेल्या पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश आणि इतर २५ हून अधिक पुस्तकांमधून निसर्ग, पशुपक्षी आणि वनस्पतींची वैशिष्ट्ये अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत मांडली आहेत.
🟢 साहित्यविश्वाची शोकांतिका
मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटलं, “चितमपल्ली यांच्या लेखनामुळे वाचकांना रानातून फिरल्याचा अनुभव येत असे. त्यांची शैली ही ललित आणि वैज्ञानिक दोन्ही होती.”
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चितमपल्ली हे वन, पशुपक्षी क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. सरकारी सेवेत असूनही त्यांचा अभ्यास पाहून भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिला, हे त्यांच्या कार्याचे मोठेपण दाखवते.”
बिग ब्रेकिंग ; जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार, पाच गंभीर जखमी
निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 18 : ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर, अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली आहे.
वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नांतून ही अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आदर्श ठरली.
पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले.
30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, हे अधिकच वेदनादायी आहे. मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.