पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न यंदाही ऐरणीवर आला आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अहवालानुसार सरासरी ध्वनी पातळी ९२.६ डेसिबल इतकी नोंदली गेली असून, खंडूजीबाबा चौकात तब्बल १०९ डेसिबलची प्रचंड पातळी गाठली. प्रशासनाचे “नियोजन आणि नियंत्रण” फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी किंचित घटल्याचे सांगितले जात असले तरी ९० डेसिबलच्या पुढे जाणारी सरासरी हीच प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देते. डीजे नियंत्रणाचा दावा केला जातो; मात्र ढोल-ताशांचा आवाजही उच्चतम मर्यादेपर्यंत पोहोचतो. पोलिस, महापालिका आणि इतर यंत्रणांनी शिस्तबद्ध व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले, पण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा परिणाम कितपत पुरेसा आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
ठिकाणनिहाय ध्वनी पातळी (सरासरी)
बेलबाग चौक – ९८.८ डेसिबल
गणपती चौक – ९२.७ डेसिबल
लिम्बराज चौक – ९३.४ डेसिबल
कुंटे चौक – ९५.२ डेसिबल
उंबया चौक – ९१.९ डेसिबल
गोखले चौक – ९३.७ डेसिबल
शेडगे वठोबा चौक – ९३.९ डेसिबल
होळकर चौक – ९४.७ डेसिबल
टिळक चौक – ८९.५ डेसिबल
खंडूजीबाबा चौक – ८२.१ डेसिबल (कमाल पातळी १०९ डेसिबल)
आरोग्यावर परिणाम
तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की इतक्या उच्च आवाजामुळे उच्च रक्तदाब, मधुमेहग्रस्त रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर गंभीर परिणाम होतो. झोपेचा अभाव, मानसिक ताण आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो.
प्रश्नचिन्ह कायम
सीओईपीचा हा उपक्रम २५ वर्षांपासून सुरू असून दरवर्षी ध्वनी प्रदूषणाचा धोका अधोरेखित केला जातो. तरीही प्रत्यक्षात नियंत्रणासाठी ठोस पावले न उचलल्याने प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.