बोगस लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटप ही चूक तर मान्य, पण प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही?
'आप'चा थेट सरकारला सवाल
पुणे : मागील वर्षी महिलांच्या प्रचंड मतदानाच्या जोरावर महायुती सरकार सत्तेवर आले, त्यामध्ये ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजनेची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, या योजनेच्या माध्यमातून लाखो अपात्र व बोगस महिलांना अनधिकृतपणे लाभ देण्यात आल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. (maharashtra ladki bahin scheme scam aap questions ministers)
किर्दत यांनी सांगितले की, या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट -Ajit Pawar), शिवसेना (शिंदे गट) यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लावून अपात्र महिलांचे अर्ज भरले. अनेक राज्य सरकारी कर्मचारी व आर्थिक निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र असूनही लाभार्थी ठरवण्यात आले. हे सर्व अर्ज निवडणुकीच्या तोंडावर खोट्या माहितीच्या आधारे भरले गेले. त्यामुळे ही निवडणूकपूर्व रणनीती होती, असा आरोप त्यांनी केला.
सद्यस्थितीत जवळपास २० लाख अपात्र महिलांना लाभ दिला गेला, हे आता सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे या घोटाळ्याच्या स्वरूपाचे गांभीर्य वाढले आहे. (Maharashtra Government)
रविवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य करताना “योजना आणताना वेळ कमी होता, अर्ज आले म्हणून वाटप झाले. आता दिलेले पैसे परत घेण्याचा प्रश्नच नाही, चूक झाली हे मान्य आहे,” असे म्हटले. तसेच, “महिलांनी अर्ज करायला नको होते, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही,” अशी भूमिका घेतली. (Beneficiary Fraud)
‘आप’चे किर्दत यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे की, अपात्र महिलांवर कारवाई नसेलच तर मग सदर पैसे वाटपास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांवर कारवाई का होत नाही?. ते पुढे म्हणाले की, यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळेस व्यवस्थित पात्रता तपासूनच पैसे देण्यात आले होते, अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी घेतली होती. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेत ४८०० कोटींपैकी सुमारे ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असावा, असा संशय आहे. किर्दत यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, एकूण गैरवाटप किती रकमेचा झाला, याची अधिकृत आकडेवारी तातडीने जाहीर करण्यात यावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई केली जावी.