maharashtra leads maha awas mission 2025। महाआवास अभियानात महाराष्ट्राला देशात आघाडी
पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी नवे सर्वेक्षण ; ३० लाख घरांचे उद्दिष्ट, ८० हजार कोटींची गुंतवणूक
maharashtra leads maha awas mission 2025 पुणे, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – maharashtra leads maha awas mission अंतर्गत राज्यातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्र घर देणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम तसेच वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (maharashtra leads maha awas mission 2025)
शहर फेरीवाला समितीची अधिसूचना राज्य सरकारकडून जारी, कायदेशीररित्या मिळणार अस्तित्व
घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी भरीव प्रमाणत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनांसारख्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या प्रकल्पांची ग्रामीण भागात वेगाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केली. राज्याच्या ग्रामविकास विभागाने देशपातळीवर चांगली कामगिरी करून राज्याचा लौकीक उंचावला असून घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण करून या लौकीकात भर घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास मंत्री श्री.गोरे म्हणाले, सर्वांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करीत असतांना गेल्या ७ वर्षात राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे १३ लाख ५७ हजार उद्दीष्ट मिळाले होते. यावर्षी २० लाख घरांचे विक्रमी उद्दीष्ट मिळाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल. या घरांना मंजूरी देण्याचे काम ४५ दिवसात करण्यात आले आणि मंजूरी पत्र एकाच दिवशी देण्यात आले. घर बांधत असतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घरकूलासाठी ५० हजाराचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
घर बांधण्यासाठी वाळूची अडचण दूर करण्यासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिहीन लाभार्थ्याला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गायरान, गावठाण जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पं.दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० हजाराहून अधिक घरे पूर्ण केली असून पुढील वर्षभरात सर्व २० लाख घरे उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या वर्षभरात ५० लाख ‘लखपती दिदी’ करण्यात येतील, असेही गोरे म्हणाले.
यावेळी ‘अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.
मुख्य घोषणा व निर्णय
- जुन्या सर्वेक्षणातील एकही पात्र लाभार्थी घराविना राहणार नाही.
- ५०,००० रुपये अतिरिक्त अनुदान आणि सौर पॅनल बसवण्याचा निर्णय.
- दुमजली घरे, गृहसंकुल योजना, गायरान व गावठाण जमीन वाटप यामुळे घर मिळवणे सुलभ.
- ‘लखपती दिदी’ योजना: महिलांचे आर्थिक सबलीकरण. या वर्षी २५ लाख लखपती दिदी, पुढील वर्षभरात ५० लाख महिलांचे लक्ष्य.
“घरकुल हा हक्क आहे, कृपा नव्हे” – केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
चौहान यांनी यावेळी सांगितले की, “घरकुलाच्या अटींमध्ये शिथिलता आणली आहे. आता दुचाकी असलेले, १५ हजारपर्यंत मासिक उत्पन्न असलेले, अडीच ते पाच एकर शेतजमीन असलेले नागरिकही पात्र ठरू शकतात.” सर्व बेघरांना घर मिळेपर्यंत नवे सर्वेक्षण करून लाभ दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“स्वाभिमानाचे घर हाच समृद्ध गावाचा पाया” – उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार म्हणाले, “घर हे केवळ वास्तू नसून, ते स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. महाआवास अभियानाने लाखो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.” घरासोबत वीज, पाणी, रस्ता, गॅस, शौचालय आणि रोजगाराची जोड देऊन राहणयोग्य घर तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार प्राप्त क्षेत्रांची यादी (2022-23)
विभागीय स्तरावर:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण):
प्रथम : कोकण
द्वितीय: नाशिक
तृतीय: नागपूर
राज्य पुरस्कृत आवास योजना:
प्रथम: नाशिक
द्वितीय: कोकण
तृतीय : पुणे
जिल्हास्तरावर:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण):
प्रथम: अहिल्यानगर
द्वितीय: सिंधुदुर्ग
तृतीय: गोंदिया
राज्य पुरस्कृत आवास योजना:
प्रथम: अहिल्यानगर
द्वितीय: सिंधुदुर्ग
तृतीय: सातारा
तालुकास्तरावर:
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण):
प्रथम: पाथर्डी (अहिल्यानगर)
द्वितीय: देवगड (सिंधुदुर्ग)
तृतीय: जवळी (सातारा)
ग्रामपंचायत स्तरावर (गृहसंकुल व बहुमजली गट) :
गृहसंकुल (ग्रामीण योजना): वांगदरी (अहिल्यानगर) – प्रथम
बहुमजली इमारत (ग्रामीण योजना): हनुमंत खेडे (जळगाव) – प्रथम
“महाराष्ट्राची गौरवगाथा” पुस्तिका प्रकाशित
‘अमृत ग्राम महाआवास अभियान’अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतींना गौरवण्यात आले. लाभार्थ्यांना चावी वाटप करून त्यांच्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार ठरलेला हा सोहळा ऐतिहासिक ठरला.